Nov 2, 2016

मालिका आणि महिला

प्रत्येक वाहिनीवरील जवळजवळ सर्वच मालिका स्त्री प्रधान असल्या तरी त्यात आजच्या काळातील स्त्रीचे वास्तवदर्शी चित्र फार कमी प्रमाणात दाखवले जाते. त्यातील स्त्री अगदी सौजन्याचा कळस तरी असते किंवा खलनायिका तरी असते! दर्शक महिलावर्ग या मालिका पाहताना त्यातील व्यक्तिरेखांशी स्वतःला रिलेट करतात. त्यात दाखवल्या जाणार्‍या परिस्थितीची त्या आपल्या घरात सांगड घालतात. परंतू मालिकांमधले विचार घरात रुजवताना वास्तव मात्र निराळे असल्यामुळे घरगुती नात्यांमधे दुरावा निर्माण होतो. माझ्या लहानपणी आठवणीतील मालिकांमध्ये एक होती ‘उडान’, आणि दुसरी होती ‘रजनी.’ या मालिकांमधील व्यक्तीरेखांचा प्रभाव इतका होता की, तेव्हा प्रत्येक मुलीला ‘उडान’मधली हुशार व कर्तृत्ववान कविता आणि 'रजनी'सारखं खंबीर आणि सडेतोड व्हायचं होतं . त्यानंतर आलेल्या सांस बहू मालिकांमध्येसुद्धा अनेकींना अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या तुलसी किंवा पार्वती व्हायचं होतं. आजच्या घडीला समाजातील वाईट चालीरीती व दुष्ट प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी गरज आहे स्त्रीला शारीरिक व मानसिक रित्या सशक्त व धीट बनवण्याची! टीव्ही हे आजच्या काळातील प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच टिव्हीची जबाबदारीही मोठी!  चांगली किंवा वाईट अशा व्यक्तीरेखा रंगवण्यापेक्षा आजच्या काळात गरज आहे ती खंबीर, सशक्त, सारासार विचार करणारी, सदसद्विवेक बुद्धीची व न्यायासाठी झगडणारी परंतु त्याचबरोबर आपल्या घराचे घरपण आणि नाती जपणाऱ्या नायिकेची!

No comments:

Post a Comment